तिसरी लाट थोपवण्यासाठी महाराष्ट्र सज्ज

50 लाख रुग्णांची शक्यता ; 6,759 रुग्णालये ; 90 हजार मेट्रीक टन ऑक्सिजनची गरज

मुंबई : कोरोनाची दुसरी लाट सरली असली तरी तिसरी लाट उंबरठ्यावर असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. दुसर्‍या लाटेत आरोग्य व्यवस्था कोलमडल्याचं चित्र पाहायला मिळालं, हाच अनुभव गाठीशी ठेऊन राज्य सरकारने उपाययोजना सुरु केल्या आहेत. या उपाययोजनांचं आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसमोर सादरीकरण करण्यात आलं. या सादरीकरणात तिसर्‍या लाटेचा सामना करण्यासाठी काय तयारी करावी लागेल, हे सांगण्यात आलं. कोरोना परिस्थितीचा सामना करण्यासाठी सध्या राज्यातील परिस्थिती काय आहे त्याचा आढावा घेण्यात आला. 

तिसरी लाट ही दुसर्‍या लाटेसारखीच किंबहुना त्याहूनही भयानक असू शकते असा अंदाज आहे. या लाटेत तब्बल 50 लाख कोरोना रुग्णसंख्या होऊ शकते अशी भीती वर्तवण्यात आली आहे. शिवाय, तिसर्‍या लाटेचा लहान मुलांना सर्वाधिक धोका आहे, तब्बल 5 लाख लहानग्यांना कोरोना होण्याचा धोका तज्ज्ञांच्या समितीने वर्तवला आहे. सध्याच्या अंदाजानुसार राज्य सरकारने यासाठी 893 कोटींची तरतूद केली आहे.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत रेमडेसिवीरची मोठी वाणवा पाहायला मिळाली. कुठेच ही इंजेक्शन मिळत नव्हती, या इंजेक्शनचा काळाबाजारही झाला आणि ती लाख रुपयांपर्यंत विकलीही गेली. हेच पाहता आता राज्य सरकार सतर्क झालंय. दुसर्‍या लाटेत तब्बल 6 लाख 90 हजार रेमडेसिवीर वापरले गेले. तिसर्‍या लाटेत तब्बल 8 लाख रेमडेसिवीरची गरज असणार आहे. ही उपलब्ध करुन ठेवण्याची तयारी राज्य सरकार करतं आहे. याशिवाय, दुसर्‍या लाटेत टोसिलीझुअ‍ॅप हे इंजेक्शनही मोठ्या प्रमाणात वापरलं गेलं. दुसर्‍या लाटेत ही 4000 इंजेक्शन लागली होती. तिसर्‍या लाटेत 10,000 इंजेक्शन मागवण्याची तयारी राज्य सरकारने केली आहे. याशिवाय दुसर्‍या लाटेत कोरोना रुग्णांवर हेपॅरिन हे इंजेक्शनचे तब्बल 7 लाख 20 हजार डोस वापरले गेले. तर तिसर्‍या लाटेत तब्बल 10 लाख इंजेक्शनची गरज लागणार आहे. हेच नाही तर मागील लाटेत 1 कोटी 50 लाख पॅरासिटॅमॉलच्या गोळ्या लागल्या होत्या, तिसर्‍या लाटेतही तेवढ्याच गोळ्यांची व्यवस्था करावी लागणार आहे.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत ऑक्सिजन मिळेनासा झाला. दुसर्‍या लाटेत तब्बल 60 हजार मेट्रिक टन ऑक्सिजन वापरला गेला. तिसर्‍या लाटेआधी आता तब्बल 90 हजार मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलंय. त्यासाठी राज्य सरकारनेही तयारी केली आहे, आणि राज्यात अनेक ठिकाणी हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारे प्लान्ट सुरु करण्यात आले आहे. रुग्णालयाच्या आवारातच हे ऑक्सिजन प्लान्ट असणार आहेत.

मॉलचे शटर पुन्हा डाउन
नव्या डेल्टा व्हेरिअंटची  दहशत आणि संभाव्य तिसर्‍या लाटेची भीती या पार्श्वभूमीवर सरकारनं नवे निर्बंध जाहीर केले आहेत. त्यामुळे यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या पाचपैकी पहिले दोन वर्ग रद्द करत असल्याचं सरकारी आदेशात नमूद करण्यात आलंय. यापुढे पहिल्या आणि दुसर्‍या वर्गात मोडणार्‍या महापालिका आणि जिल्ह्यांना सध्या तिसर्‍या वर्गासाठी असलेले नियम लागू होणार आहेत. एखादं महानगर किंवा जिल्हा अगदी पहिल्या वर्गात  जरी मोडत असेल, तरी सध्या तिसर्‍या वर्गासाठी असलेले नियमच लागू होणार आहेत. तिसर्‍या वर्गात मॉल आणि थिएटर्सना मनाई आहे. त्यामुळे शहरातील कोरोना पॉझिटीव्हीटी दर किती कमी झाला आणि ऑक्सिजन बेडची उपलब्धता कितीही वाढली, तरी मॉलमध्ये फिरायला जाण्याचं किंवा थिएटरमध्ये सिनेमा पाहायला जाण्याचं स्वप्न आणखी काही काळ गुंडाळूनच ठेवावं लागणार आहे.
4 वाजता शटर डाऊन
रेस्टॉरंट आणि इतर दुकानं सुरु राहतील, पण तीदेखील जास्तीत जास्त दुपारी 4 वाजेपर्यंत. म्हणजे कोरोना रुग्णांची संख्या सर्वात कमी असलेलं शहर असेल, तरीदेखील जास्तीत जास्त 4 वाजेपर्यंतच रेस्टॉरंट्स सुरू राहणार आहेत. पुढील काही आठवड्यांमध्ये दिसणारं चित्र आणि डेल्टा व्हायरसच्या प्रसाराचा वेग या बाबींचा विचार करून सरकार पुढील निर्णय घेणार आहे. तोपर्यंत तरी सर्वांना पुन्हा एकदा निर्बंधांसह कोरोनाचा सामना करण्यासाठी तयार राहावं लागणार आहे.
चाचण्यांची संख्या वाढवावी लागणार
तिसर्‍या लाटेत कोरोना चाचण्यांची संख्या वाढवणं गरजेचं असल्याचं सांगण्यात आलं आहे. चाचण्या वाढवून, संक्रमित रुग्णांना विलगीकरण कक्षात वा रुग्णालयात भरती करावं असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. दुसर्‍या लाटेत 1 कोटी आरटीपीसीआर तर 70 लाख अँटिजेन टेस्ट करण्यात आला. आता तिसर्‍या लाटेत 1 कोटी 25 लाख आरटीपीसीआर तर 88 लाख अँटिजेन टेस्ट कीट खरेदी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. जेणेकरुन, लक्षणं असणार्‍या प्रत्येकाची चाचणी करणं शक्य होऊ शकतं.

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट