पावसाची हुलकावणी शेतकरी चिंताग्रस्त!
पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी; जिल्ह्यात मशागतीची सुमारे ८० टक्के कामे पूर्ण
पेण | दीपक लोके :- खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यासह पेण तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेती मशागतीची बहुतांश कामे पूर्ण केली असून आता बळीराजाचे डोळे पावसाकडे लागले आहेत. हवामान खात्याने यंदा मान्सूनचे आगमन लवकर होण्याचा अंदाज वर्तविल्यामुळे शेतकऱ्यांनीही वेळेआधीच नांगरणी, वखरणी, बांधबंदिस्ती, शेतसफाई आदी मशागतीची कामे पूर्ण केली आहेत. मात्र जून महिना अर्ध्याहून अधिक संपत आला तरी समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे.
मे महिन्यापासूनच ग्रामीण भागात खरीप हंगामाच्या तयारीला वेग येतो. यावर्षीही हवामान विभागाच्या अंदाजावर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी शेतीची तयारी युद्धपातळीवर केली. अनेक ठिकाणी भातशेतीसाठी आवश्यक असलेली मशागत पूर्ण झाली असून काही शेतकऱ्यांनी रोपवाटिकांचीही तयारी केली आहे. मात्र अपेक्षित पाऊस न झाल्याने पुढील शेतीकामे रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरवर्षी मे महिन्याच्या अखेरीस किंवा जूनच्या सुरुवातीला मान्सूनपूर्व सरींचे आगमन होऊन वातावरणात गारवा निर्माण होतो. त्यामुळे पेरणीसाठी पोषक परिस्थिती तयार होते. यंदा मात्र परिस्थिती वेगळी दिसून येत आहे. जून महिन्यातही उन्हाची तीव्रता कायम असून नागरिकांसह शेतकऱ्यांनाही उकाड्याचा सामना करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून आकाश ढगाळ असले तरी पावसाची अपेक्षित सर बरसत नसल्याने शेतकरी वर्गात नाराजीचे वातावरण आहे.
पेण तालुक्यातील बहुतांश भागात शेती ही पूर्णतः पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे पावसाच्या आगमनाला विलंब झाल्यास भात लागवडीच्या वेळापत्रकावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. काही भागात विहिरी, तलाव आणि जलसाठ्यांमध्ये अद्याप पाणी उपलब्ध असले तरी खरीप हंगामासाठी भरपूर आणि नियमित पावसाची आवश्यकता आहे.
मागील दोन वर्षांत निसर्गाने काही प्रमाणात साथ दिल्याने परिसरातील जलसाठ्यांमध्ये पाण्याची पातळी चांगली टिकून राहिली होती. जरी काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले, तरी भूजल पातळीत वाढ झाल्याने रब्बी हंगामाला त्याचा फायदा झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी नव्या उत्साहाने यंदाच्या खरीप हंगामाची तयारी केली. मात्र पावसाचे आगमन लांबल्याने शेतकऱ्यांच्या आशांवर विरजण पडण्याची भीती निर्माण झाली आहे.
सध्या जिल्ह्यासह पेण तालुक्यात मशागतीची सुमारे ८० टक्के कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामेही अंतिम टप्प्यात आहेत. आता केवळ मान्सूनच्या दमदार आगमनाची प्रतीक्षा असून "लवकरात लवकर चांगला पाऊस पडावा आणि खरीप हंगाम सुरळीत पार पडावा" अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.
"रायगड जिल्ह्यातील ज्या भागात भात रोपवाटिकेची पेरणी पूर्ण झाली आहे, त्या ठिकाणी रोपवाटिकेच्या वाढीच्या कालावधीत कमी पाऊस अथवा पावसाचा खंड पडल्यास शेतकऱ्यांनी घाबरून न जाता पर्जन्यमान व जमिनीतील उपलब्ध ओलावा लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार नदी, नाले, विहिरी, शेततळे किंवा इतर उपलब्ध जलस्रोतांचा वापर करून संरक्षक सिंचन द्यावे. तसेच सिंचन देण्यापूर्वी रोपवाटिकेतील तणांचे वेळेवर नियंत्रण करणे आवश्यक आहे. हवामानातील बदल लक्षात घेता कृषी विभागाच्या सूचनांचे पालन करून शेतीचे नियोजन करावे. जिल्ह्यात खरीप हंगामासाठी आवश्यक तयारी करण्यात आली असून शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता कृषी विभागाशी संपर्क साधावा."
प्रविण थिगळे
जिल्हा कृषी उपसंचालक, रायगड.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times